पुस्तकांविषयी थोडक्यात ...
प्रथम पुष्प: नामस्मरणमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने आणि आशीर्वादाने शब्दांकीत झालेले प्रथम पुस्तकरूपी पुष्प. पुस्तकाविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर “इदम न मम” हेच वाक्य मुखी येते. त्याचे कारण म्हणजे,
एकतर लेखकाचा मुळात मितभाषी स्वभाव
त्यात भाषा व लेखन शैलीचा अभाव
पण स्वामी इच्छेपुढे आपल्या इच्छेला नसतो कोणताच वाव
आपल्या कोणत्याच आडकाठीचा त्यांच्यासमोर लागत नाही निभाव.
© पूनम$
आपल्या गुरूंप्रती असलेली अनन्यसाधारण भक्ती व अढळ श्रद्धा आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर उपयोगी येते. या प्रवासात काही अलभ्य लाभ होतात तर बर्याच गोष्टी सोडाव्याही लागतात. परंतु या खडतर तसेच अकल्पित प्रवासाच्या अंती आपल्याला लाभतो तो सुखद, समाधानकारक व अभय प्रदान करणारा, वात्सल्य स्वरुपातील “श्री स्वामी समर्थरूपी विसावा.”
नाम साधनेच्या प्रवासाअंती लाभलेला
श्री स्वामी समर्थरूपी विसावा
श्रीगुरुमाऊलीच्या कृपेचा असीम ठेवा
श्री स्वामी समर्थरूपी विसावा
अनुभूतींच्या प्रकाशवाटेतून लाभलेला
श्री स्वामी समर्थरूपी विसावा.
असा हा चिरंतन टिकणारा श्री स्वामी समर्थरूपी विसावा प्रत्येक वाचकाला लाभो ही स्वामींचरणी मन:पूर्वक प्रार्थना.
!! श्री स्वामी समर्थ !! जय शंकर !!

द्वितीय पुष्प: श्री स्वामी समर्थ नामलहर
२०१९ पासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने व आशीर्वादामुळे लघुलेख संग्रहाचे लेखन सुरु झाले. आज दुसरे पुस्तक प्रकाशित होत असताना आवर्जून नमूद करावेसे वाटते की जिथे चार ओळींचा अर्ज लिहितानासुद्धा मला मार्गदर्शनाची गरज लागायची तिथे हे लघुलेख संग्रहाचे लिखाण होणे व कालांतराने त्यांचे पुस्तकामध्ये रूपांतरण होणे हे कार्य माझ्यासाठी एकटीने तरी शक्य नाही. झालेले लेखन वाचताना हे लेखन आपण करू शकत नाही अशी भावना अगदी न चुकता मनामध्ये उत्पन्न होते. त्यात कवितांचे लेखन होणे ही तर कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. श्रीगुरुकृपेशिवाय हे कदापि शक्य नाही. © पूनम$
हे पुस्तकरूपी दुसरे पुष्प म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची, त्यांच्या कृपेमुळे आलेल्या अनुभूतींची व श्रीगुरु नामाची महती वर्णन करताना विविध प्रसंगानुसार ज्या कवितांचे लेखन महाराजांनी करवून घेतले त्यांचा समूह.
!! श्री स्वामी समर्थ !! जय शंकर !!

तृतीय पुष्प: श्री स्वामी समर्थ आशीष
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने आणि आशीर्वादाने शब्दांकित झालेले तृतीय पुष्प. हे पुष्प म्हणजे श्रीगुरूभेट झाल्यानंतरच्या प्रवासात श्रीगुरुकृपेमुळे भेटलेल्या सिध्द, विभूती, तसेच त्यांचे स्थानदर्शन व यादरम्यान लाभलेल्या विविध अनुभूती यांचे थोडक्यात वर्णन. २०१९ पासून महाराजांनी लेखन करून घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून तिसऱ्या पुस्तकाचे लेखन पूर्ण होईपर्यंत बऱ्याचदा दिव्य प्रचितींचा लाभ करून दिला. © पूनम$
!! श्री स्वामी समर्थ !! जय शंकर !!
चतुर्थ पुष्प: श्रीगुरुमेहेर
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने शब्दांकित होत असलेले हे चतुर्थ पुस्तकरुपी पुष्प. पुस्तकामध्ये जरी हे नमूद केले असले की सर्व अधिकार लेखकाधीन आहेत तरीसुद्धा पुस्तकामध्ये कोणत्या गोष्टींचा उल्लेख होणार, कसा होणार, कधी होणार याचे सर्व अधिकार हे श्रीगुरुंच्याच अधीन आहेत याची नोंद घ्यावी.
“गुरुकृपेशिवाय आणि त्यांच्या इच्छेशिवाय काहीही शक्य नाही.” बरेच दिवस लिखाण थांबलेल्या स्थितीमध्येसुद्धा “पुस्तक अमुक तारखेला लिहून पूर्ण होईल असा संदेश मिळणे आणि पुढील काही दिवसांत ते पूर्ण करून घेणे” हेच सूचित करत आहे की केवळ आणि केवळ श्रीगुरुकृपा हे घडवून आणत आहे. म्हणजेच “ज्यांचे कार्य आहे ते स्वतःच पूर्ण करून घेत आहेत.” © पूनम$
या पुस्तकामध्ये श्रीगुरू, अनुग्रह, श्रीगुरुपादुका आणि श्रीगुरुतत्व याबाबत जे काही अनुभव सद्गुरुकृपेने आले तसेच या सर्वांचे अनन्यसाधारण महत्व थोडक्यात शब्दांकित करण्यात आले आहे.
!! श्री स्वामी समर्थ !! जय शंकर !!
©Poonam$. All rights reserved.